बंद

    धोके, असुरक्षितता, जोखीम याबद्दल माहिती

    महाराष्ट्र नैसर्गिक आपत्तीप्रवण क्षेत्र आहे. ह्यामध्ये भूस्खलन, पूर, चक्रीवादळ, भूकंप, दुष्काळ आणि वीज पडण्याच्या घटनांचा समावेश होतो. मुसळधार पाऊस आणि मानवनिर्मित कारणांमुळे प्रामुख्याने पश्चिम घाट आणि कोंकण प्रदेशात भूस्खलनाची जोखीम वाढत आहे. याचा सर्वाधिक परिणाम रायगड, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर या जिल्ह्यांवर होतो. मान्सून काळात येणाऱ्या पुराचा फटका मुंबई, पुणे, नागपूर यांसारख्या शहरी भागांसह ग्रामीण आणि किनारपट्टी तसेच नद्यांच्या काठच्या भागांना मोठ्या प्रमाणात बसतो. महाराष्ट्राची भूवैज्ञानिक रचना गुंतागुंतीची असल्याने राज्य भूकंपसंकटग्रस्त आहे. मुंबई आणि ठाणे हे अति-जोखीम असलेल्या झोन IV मध्ये, पुणे आणि नाशिक मध्यम-जोखीम असलेल्या झोन III मध्ये, तर नागपूरसारखे आग्नेय भाग मधूनमधून भूकंपाचे सौम्य धक्के जाणवणाऱ्या तुलनेने कमी जोखीम असलेल्या झोन II मध्ये समाविष्ट आहेत. अरबी समुद्राच्या विस्तीर्ण किनारपट्टीमुळे महाराष्ट्र पूर्वी चक्रीवादळांच्या दृष्टीने तुलनेने सुरक्षित मानला जात होता. मात्र, हवामान बदलाच्या परिणामामुळे आता चक्रीवादळांचा धोका वाढत आहे. खास करून मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर इथे मुसळधार पाऊस, जोरदार वारे, समुद्री लाटा आणि पूर यांचा प्रभाव जाणवत असल्यामुळे हे किनारी जिल्हे जोखमीच्या क्षेत्रात येतात. वारंवार पडणाऱ्या दुष्काळामुळे कृषी उत्पादन आणि जलसंपत्तीच्या उपलब्धतेला सतत धोका निर्माण होत आहे. पूर्व महाराष्ट्रात, विशेषतः चंद्रपूर आणि नागपूर जिल्ह्यांमध्ये वीज पडण्याच्या घटनांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे मानवी जीवितासोबतच शेती आणि पशुधनालाही मोठा धोका निर्माण होतो.

    दुष्काळ:

    महाराष्ट्राला वारंवार तीव्र दुष्काळाला सामोरे जावे लागत असल्यामुळे त्याचा परिणाम लक्षावधी लोकांवर, शेती तसेच पाणी पुरवठ्यावर होतो. दुष्काळ वारंवारता निर्देशांकातील 1901ते 2021 ह्या कालावधीतील आकडेवारीमुळे राज्यातील विविध भाग किती दुष्काळप्रवण आहेत हे लक्षात येते. आयआयटी गांधीनगर येथील वॉटर अँड क्लायमेट लॅबने केलेल्या अभ्यासानुसार, पावसाळ्यासाठी प्रमाणित पर्जन्यमान वाष्पोत्सर्जन निर्देशांक (एसपीईआय) वापरून दुष्काळ वारंवारता निर्देशांक (डीएफआय) तयार करण्यात आला आहे. सदर निर्देशांक एसडीएमएच्या प्रकल्प व्यवस्थापन विभागाद्वारे तयार केला जातो आणि त्यात महाराष्ट्रात कुठे आणि किती वेळा दुष्काळ पडतो याचे वर्गीकरण केलेले असते.

    भूस्खलन:

    महाराष्ट्रात भूस्खलन ही एक गंभीर नैसर्गिक आपत्ती असून खास करून पश्चिम घाट आणि कोंकण भागांमध्ये याचे प्रचंड परिणाम जाणवतात. मुसळधार पाऊस, अस्थिर उतार, जंगलतोड आणि मानवी हस्तक्षेप हे भूस्खलनाकरता कारणीभूत घटक असून त्यामुळे मानवी जीवन, पायाभूत सुविधा आणि पर्यावरणाला मोठा धोका निर्माण होतो. महाराष्ट्राच्या भौगोलिक रचनेमुळे भूस्खलनाची शक्यता जास्त असल्याने त्यावर प्रतिबंधक उपाय योजना करणे महत्वाचे ठरते.

    रायगड, रत्नागिरी, पुणे, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, अहमदनगर आणि सांगली हे जिल्हे भूस्खलनाच्या दृष्टीने अतिप्रवण आहेत. कोकणातील तीव्र उतार आणि मुसळधार मान्सून, तसेच पश्चिम घाटातील जंगलतोडीमुळे वारंवार भूस्खलनाच्या घटना घडतात. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणाच्या (जीएसआय) आकडेवारीनुसार रायगडमधल्या 106 गावात भूस्खलनाच्या 175 घटना घडल्या तर पुणे विभागात 144 गावांमध्ये 237 घटना घडल्या तर रत्नागिरी विभागातील 16 6 गावांमध्ये भूस्खलनाच्या 273 घटना घडल्याने ह्या विभागांना भूस्खलनाचा सर्वाधिक फटका बसल्याचे लक्षात येते.

    पूर:

    महाराष्ट्रात पूर येण्याचे प्रमाण वाढत असल्यामुळे लक्षावधी लोकांना याचा फटका बसत असून प्रचंड प्रमाणात नुकसानही होत असते. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (एसडीएमए) कोणकोणत्या परिस्थितीत पूर येतो याचा अभ्यास करत असून त्यानुसार उपाययोजनाही आखत असते. महाराष्ट्रात वेगवेगळ्या कारणांमुळे पूर परिस्थिती निर्माण होते. मुसळधार पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहू लागल्यामुळे पूर येतो, शहरी भागात निकृष्ट किंवा अपुऱ्या जलनिःसारण व्यवस्थेमुळे पूर येतो तर किनारपट्टीच्या क्षेत्रात उंच लाटांमुळे पूर येतो. मुसळधार पाऊस आणि वशिष्ठीसारख्या नद्यांमुळे मुंबईसह कोंकण भागात किनारपट्टी आणि नदीकाठच्या पुराचा धोका निर्माण होतो. पश्चिम महाराष्ट्रात पुणे वगैरे भागात कृष्णा नदी पुरास कारणीभूत ठरते. मुंबई, पुणे आणि नागपूरसारख्या मोठ्या शहरांमध्ये अनियंत्रित अतिक्रमण, निकृष्ट जलनिःसारण व्यवस्था आणि अतिवृष्टी यामुळे शहरी भागात पुराचे प्रमाण अधिक असल्याचे जाणवते. मुंबईला 2019, 2020, 2021 आणि 2023मध्ये सातत्याने पुराचा सामना करावा लागला. मिठी नदी दुथडी भरून वाहू लागल्याने आणि भरतीच्या उंच लाटांमुळे पूर निर्माण होऊन जनजीवन विस्कळीत झाले.

    वीज पडणे:

    वीज पडणे ही महाराष्ट्रातील एक गंभीर नैसर्गिक आपत्ती आहे. हवामानातील वैविध्यामुळे राज्यात वारंवार वीज पडण्याच्या घटना घडतात, विशेषतः मान्सून हंगामात अशा घटना अधिक असतात. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (एसडीएमए) प्रकल्प व्यवस्थापन विभागाने केलेल्या अभ्यासानुसार वीज पडण्याच्या घटनांचा वाढता परिणाम आणि उच्च जोखमीची क्षेत्रे निश्चित करण्यात आली आहेत. या अभ्यासानुसार महाराष्ट्रातील विजेच्या लखलखाटाची घनता प्रतिवर्षी 0.1 ते 4.5 प्रति चौरस किलोमीटर इतकी आहे, त्यामुळे यावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य प्रतिबंधात्मक उपाय आणि पूर्व सूचना प्रणाली आवश्यक ठरतात. पूर्व महाराष्ट्र, विशेषतः चंद्रपूर आणि नागपूर, हे वीज पडण्याच्या घटनांचे अतिसंभाव्य ठिकाणे (हॉटस्पॉट) मानले जातात. या भागांमध्ये वीज चमकण्याची घनता जास्त असल्यामुळे मानवी जीवन, शेती आणि पशुधनाला मोठा धोका निर्माण होतो.

    भूकंप:

    महाराष्ट्र मोठ्या प्रमाणावर औद्योगिकीकरण झालेले व लोकसंख्या असलेले राज्य असून त्याच्या गुंतागुंतीच्या भूरचनेमुळे भूकंपप्रवण क्षेत्र आहे. हिमालयाच्या तुलनेत इथे भूकंपी हालचाली कमी असल्या तरी पूर्वीच्या भूकंपाचा अनुभव लक्षात घेता भूकंपाने तोंड देण्यासाठी पूर्वतयारी करणे आवश्यक ठरते. दख्खनच्या पठारातील स्तरभ्रंश आणि भूगर्भातील हालचालींमुळे राज्य भूकंपप्रवण बनले आहे. भारतीय मानक संस्थेने (बीआयएस) भूकंपाच्या शक्यता आणि तीव्रतेच्या आधारे महाराष्ट्राची विविध भूकंपीय क्षेत्रांमध्ये विभागणी केली आहे. क्षेत्र 4 (अति जोखमीची क्षेत्रे) मध्ये उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रातील मुंबई आणि ठाण्याचा समावेश आहे, ही ठिकाणे पश्चिम घाटापासून जवळ असल्याने आणि भूगर्भीय दोषांमुळे इथे अधिक तीव्रतेचे भूकंप होण्याची शक्यता आहे. क्षेत्र 3 मध्ये (मध्यम जोखीम क्षेत्र) पुणे, नाशिकसह महाराष्ट्राच्या मोठ्या भागाला अधूनमधून भूकंपाचे धक्के जाणवत रहातात. क्षेत्र 2 मध्ये (कमी जोखमीचे क्षेत्र) मध्ये तीव्र भूकंप होण्याची शक्यता कमी असलेल्या नागपूरसारख्या आग्नेय आणि पूर्व भागाचा समावेश आहे. स्थिर दख्खन पठारासारख्या स्थिर पठारावर असूनही, महाराष्ट्रात अंतर्गत (इंट्राप्लेट) भूकंपीय हालचालींमुळे विध्वंसक भूकंप झाले आहेत.

    चक्रीवादळ:

    अरबी समुद्राला विस्तीर्ण किनारपट्टी लाभलेला महाराष्ट्र गतकाळात फारसा चक्रीवादळ प्रवण नव्हता. परंतु, अलीकडच्या काळात हवामान बदल आणि समुद्रपृष्ठीय तापमान वाढल्यामुळे चक्रीवादळांची वारंवारता आणि तीव्रता वाढली आहे. चक्रीवादळांमुळे मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर ह्यांसारख्या किनारपट्टीवरील जिल्ह्यांना गंभीर धोका निर्माण होऊन मुसळधार पाऊस, वेगवान वारे, वादळी वारे आणि पूरस्थिती निर्माण होते. तीव्र हवामानाच्या अशा घटनांमुळे जीवितहानी तसेच पायाभूत सुविधांचे नुकसान होते , उपजीविकेवर परिणाम होतो आणि पिकांचे नुकसान होते.