आपत्ती निवारण प्रकल्प
आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनवर्सन विभागाने 2022-23पासून आपत्ती निवारणान्तर्गत भूस्खलन आपत्ती व्यवस्थापन अंमलबजावणीचा समावेश असलेला व्यापक कार्यक्रम हाती घेतला आहे.
राज्यभर करावयाच्या अंमलबजावणीसाठी रु. 5100 कोटी खर्चाच्या 1,676 निवारण कामांना मान्यता मिळाली आहे. ह्यात भूस्खलन आपत्ती व्यवस्थापनांतर्गत रु. 666 कोटी खर्च असलेल्या 231 भूस्खलन निवारण कामांचाही समावेश आहे.
महाराष्ट्रातील भूस्खलन आपत्ती निवारण योजना
महाराष्ट्रातील सह्याद्री, कोकण आणि दख्खनच्या पठारी भागात दरडी कोसळण्याचा धोका वारंवार उद्भवतो. 19 जुलै 2023 रोजी रायगड जिल्ह्यातील इरशाळवाडी गावात प्रलयंकारी दरड कोसळून 29 जणांचा मृत्यू झाला होता, तर 56 जण ढिगाऱ्याखाली गाडले गेले होते. 228 रहिवाशांपैकी केवळ 142 रहिवासी जिवंत राहिले.
याचा परिणाम म्हणून निवारण योजना ठरवण्यासाठी महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने गावनिहाय भूस्खलन जोखीम विश्लेषण करत भूस्खलन संवेदनशीलता आणि जोखीम मूल्यांकन केले. ह्याद्वारे रत्नागिरी, पुणे, सातारा, कोल्हापूर, रायगड, ठाणे, सिंधुदुर्ग, अहमदनगर, नाशिक, पालघर आणि सांगली ह्या 11 जिल्ह्यातील 483 गावांचा समावेश आहेत जिथे प्राधान्याने भूस्खलन निवारणाची कामे हाती घेण्यात येणार आहेत. नियामक, संरचनात्मक आणि असंरचनात्मक निवारण उपाययोजनांचा समावेश असलेल्या व्यापक भूस्खलन जोखीम व्यवस्थापन धोरणाची अंमलबजावणीला सुरूवात झाली आहे.